गणेशोत्सव सातासमुद्रापार केव्हाच पोचला आहे.
पण अंटार्क्टिकावरही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाऊ शकतो, याची कल्पनाच कोणी
केली नसेल. अशाच मी अनुभवलेल्या गणेशोत्सवाची गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे.
त्या आधी अंटार्क्टिका म्हणजे काय आहे, हे थोडंसं जाणून घेऊया.
अंटार्क्टिका म्हणजे पृथ्वीवर असणाऱ्या सात खंडांपैकी
एक खंड. या खंडाचे वैशिष्ठ्य म्हणजे हा खंड चारही बाजुंनी संपुर्णपणे पाण्याने वेढलेला
आहे आणि यावर फक्त आणि फक्त बर्फाचं साम्राज्य आहे. याच खंडावर पृथ्वीचा भौगोलिक दक्षिण
ध्रुव देखील आहे. पृथ्वीवरील सर्वात कमी तापमान असणारा प्रदेश म्हणून अंटार्क्टिका
प्रसिद्ध आहे. भारत सरकारद्वारे येथे दरवर्षी वैज्ञानिक संशोधन मोहिमा राबविल्या जातात.
या अशा ठिकाणी वर्षभर राहण्याची व काम करण्याची संधी मला मिळाली ही गणपती बाप्पाचीच
कृपा म्हणावी.
अंटार्क्टिका खंड
भारताचे अंटार्क्टिकामधील वैज्ञानिक संशोधन केंद्र - भारती
सन २०१६. घरापासून १२००० हजार किलोमीटर दूर सर्वबाजूने
समुद्राने वेढलेल्या बर्फाने आच्छादलेल्या महाकाय बेटावर रहायला येऊन जवळजवळ ८-९ महिने
झाले होते. रोजची कामे करुन दिवस काढायचे काम सुरु होते. या दिवसात सूर्य केवळ ३-४
तासच दिसत असे. काम नसताना सहकाऱ्यांशी गप्पा मारत वेळ घालवणं या सारखा विरंगुळा इथे
नव्हता. अशातच एकेदिवशी सहका-यांबरोबर गप्पा मारताना एकजण म्हणाला, “अरे आता गणेशोत्सव
१५ दिवसांवर आलाय. आपल्याकडे जोरात तयारी सुरु झाली असेल ना?” त्यावर मी म्हणालो,
“हो ना रे, आपल्याला आता या सगळ्याची यावर्षी मजा घेता येणार नाही.” असं म्हणत दोघेही
चुकचुकलो. पण मनात मात्र गणेशोत्सवाचाच विचार घोळत राहिला. दरवर्षीप्रमाणे गणपतीची
आरास, पूजा-अर्चा, नैवेद्य हे सगळं यंदा करता येणार नाही, याची हूरहूर मनाला होत होती.
लहानपणापासून घरातील गौरी-गणपतीची आरास करण्यायपासून ते पूजा-अर्चा करेपर्यंत दहा दिवस
कसे जायचे ते समजायचे नाही. दोन दिवस याच विचारात
गेले. जुन्या आठवणी डोळ्यासमोरुन तरळून गेल्या.
विचार करता करता सरतेशेवटी मनाने पक्कं केलंच
की, यंदा छोट्या प्रमाणात का होईना पण गणेशोतसव साजरा करायचाच. त्यासाठी सर्वप्रथम
एका सहका-याशी चर्चा केली. त्यानेही माझ्या कल्पनेस होकार दर्शवला. मग काय, लागलो आम्ही
तयारीला.
संशोधन केंद्रात “प्रार्थनागृह" नावाची
खोली होती. इथे मोहीमेतील सर्व जातीधर्माचे सदस्य प्रार्थना करु शकत असत. आम्ही दर
मंगळवारी सामुहिक आरतीचे आयोजन करत असू. म्हणून गणेशोत्सवासाठी गणेशाच्या मूर्तीची
प्राणप्रतिष्ठापणा करण्यासाठी याच प्रार्थनागृहाची निवड केली. या प्रार्थनागृहात फार
आधी कुणी एका गणेशभक्ताने सुंदर अशी सुबक गणेशाची लहानशी मूर्ती आणून ठेवली होती. ही
छानशी मूर्ती गणेशोत्सवाच्या काळात स्थानापन्न करायची असे आम्ही ठरवले.
प्रार्थना गृह
गणपतीच्या मूर्तीची निवड करून झाल्यावर आम्ही
आमचा मोर्चा आरास करण्याकडे वळविला. आपल्याकडे गणेशोत्सव म्हटलं की गणपती समोरील आरास
ही देखील तितकीच महत्वाची असते. गणेशोत्सव काळात आराशीला एक प्रकारचं भक्ती-भावनेचं
वलय असते.
ज्याठिकाणी
खाण्यापिण्याचं, दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणारं सामान हे वर्षातून एकदाच यायचं
तिथे आम्हाला आराशीचं सामान मिळणे ही अशक्य गोष्ट होती. तरीदेखील काहीतरी आरास करायचीच
ही भावना स्वस्थ बसू देत नव्हती. असंच एकेदिवशी विचार करत असताना माझ्या खोलीच्या खिडकीतून
बाहेर न्याहाळत नजर गेली तर समोर नजर जाईपर्यंत बर्फच बर्फ दिसला. नुकताच बर्फ पडून
गेल्यामुळे (Snow Fall) बाहेरची शुभ्रता डोळ्याला सहन होत नव्हती. हे दृश्य बघताना मनात विचार आला, इतके दिवस कितीतरी वर्षांनुवर्षे
हा प्रदेश बर्फाच्छादित आहे. ना इथे मनुष्यवस्ती आहे, ना इथल्या भूभागावर कुठल्याही
प्रकारची झाडे आहेत. इथे कुठल्याही प्रकारचा भूचर प्राणी वास्तव्यास नाही. समुद्रातील
मासे, इतर जलचर आणि पेंग्वीन पक्षी हीच इथली जैवविविधता. यातील पेंग्वीन पक्षी हे समुद्रकिना-यावर,
आमच्या केंद्राजवळ ‘शतपावली’ करण्यासाठी येत असत.
म्हणून मग ठरवलं की, आराशीचा विषय (Theme) हा अंटार्क्टिकाच असेल.
जरी आम्ही बर्फाच्छादित प्रदेशात राहत असलो तरी
केंद्रामध्ये बाहेरचा बर्फ आराशीसाठी आणणं शक्य नव्हतं, कारण केंद्रामध्ये १५ ते २०
डिग्री सेल्सिअस तापमान हिटरद्वारे कायम राखण्यात येते. म्हणून बर्फाच्या जागी कापूस
वापरुन बर्फाच्छादित भूभाग तयार केला. त्यावर चार-पाच पेंग्वीन्स फिरताना दिसावेत यासाठी
पेंग्वीन्सचे फोटो प्रिंट करुन पुठ्ठ्यावर चिकटवले. अजून चारपाच पुठठे घेऊन गणपतीस
सिंहासनारुढ करण्यासाठी सिंहासन बनविले. त्यामागे अंटार्क्टिकाचा अंतराळातून घेतलेला
फोटो चिकटवला आणि इतर छोटी मोठी सजावट करुन आराशीचे काम पूर्ण केले.
अखेर गणेशचतुर्थीचा दिवस उजाडला. आदल्यादिवशीच
तेथील आचा-याला (आचारी दिल्लीचा रहिवासी असल्याने) महाराष्ट्रीय पद्धतीने मोदक कसे
बनवायचे याची कल्पना देऊन ठेवली होती. केंद्रामध्ये सर्व सहका-यांमध्ये उत्साहाचे वातावरण
होते. सर्वजण पारंपारिक पोषाख घालून तयार झाले होते. मोदकाचा वास संपूर्ण केंद्रामध्ये
दरवळत होता.
श्रीगणेशाचे आगमण केंद्राबाहेरून प्रार्थनागृहापर्यंत
करण्यासाठी छोट्याशा मिरवणुकीचे आयोजन केले. प्रार्थनाघरातून कोणी पखवाद घेतले, कोणी
ताशा घेतला, कोणी खंजिरी घेतली, तर कोणी टाळ घेतले. सर्वजण गणेशमूर्ती घेऊन केंद्राबाहेर
बर्फामध्ये गेलो. गणेशमूर्ती माझ्याच हातात असल्यामुळे अनवाणी पायानेच बर्फात गेलो.
तिथून केंद्राकडे वाजत गाजत गणपती बाप्पा आगमनस्थ झाला. संपूर्ण केंद्रात एकच जल्लोषाचे
वातावरण झाले. "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया", "एक दोन तीन
चार, गणपतीचा जयजयकार" असे जयघोष केंद्रात घुमू लागले. काही हौशी सदस्य या वाद्यांच्या
तालावर नाचू लागले. उत्साह पार पराकोटीला गेला.
जवळपास अर्ध्या पाऊण तासाच्या मिरवणुकीनंतर वाजतगाजत
गणपती बाप्पा प्रार्थनागृहाजवळ आले. मी पुढे होऊन आणखी चार जणांना हात लावण्यास सांगून
गणपतीस स्थानापन्न केले. सर्व सदस्यांमध्ये उत्तरेकडील हिंदी भाषिक सदस्यांची संख्या
जास्त असल्यामुळे आरती सुरु केली. “जय गणेश जय गणेश जय गणेश देवा I माता जाकी पार्वती
पिता महादेवा II” यानंतर “ सुखहर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम
कृपाजयाची”.....
अंटार्क्टिकाचीच आरास असलेला अंटार्क्टिकामधील गणपती
मोदकांचा नैवेद्य बाप्पाचरणी ठेवून मनोभावे नमस्कार
केला. सर्व सदस्यांनी एक एक करत गणरायाचे दर्शन घेतले. सर्वांनी मोदकरूपी नैवेद्य प्राशन
केला. सर्वजण हर्षोल्हासात दिसत होते. गणपतीला पूजेसाठी कुठलीही ताजी फुले नाही, हार
नाही, ना अगरबत्ती, ना धूप, ना दिवा... तरीही बाप्पाने हे सर्व गोड मानून घेतले असावे.
बाप्पाच्या आगमनाने आनंद गगनात मावत नव्हता. विशेष म्हणजे कुठल्याही भौगोलिक परिस्थितीमुळे
गणेशभक्तीत खंड पडला नव्हता. यामुळे एक आत्मिक समाधान लाभले होते.
तिथुन पुढे रोज एक एक सदस्यांना आरतीचा मान देऊन
सकाळ संध्याकाळ आरती केली जात होती. सर्वच जण भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले असल्यामुळे
नवीन नवीन चाली रूढींची, परंपरांची ओळख होत होती. आपापल्या भाषेत संध्याकाळच्या आरतीच्या
वेळी प्रत्येक जण गणरायाचं नामस्मरण करत होता.
नैवेद्यासाठी कधी शिरा तर कधी जिलेबी तर कधी लाडू असे पदार्थ केले जात होते.
श्रीगणेशाची मनोभावे पूजा होत होती. अशा प्रकारे जो तो आपापल्या परीने गणेशोत्सवात
भाग घेत होता.
अखेर तोही दिवस उजाडलाच.. अनंतचतुर्दशी.. प्रत्येक
गणेशभक्ताचा गणेशोत्सोवातील नावडता दिवस. आज गणपतीला निरोप द्यावा लागणार होता. यावेळी
मात्र आम्हाला विसर्जन मिरवणूक काढता येणार नव्हती. केंद्र प्रमुखांनी तशी परवानगी
नाकारली होती. इतके दिवस खूप उत्साहाचे वातावरण होते पण आता जड अंत:करणाने गणरायाला
निरोप द्यायचा होता. आमच्यातील एका तेलुगू भाषिक ज्येष्ठ सदस्याच्या सांगण्यावरून आम्ही
आकाराने छोटी हळदीची मूर्ती मुख्य मूर्तीबरोबर स्थानापन्न केली होती. तीच छोटी मूर्ती
आम्ही एका बादलीत पाणी घेऊन विसर्जित केली, कारण बाहेर होता तो केवळ बर्फच !